एक छोटेसे, पण टुमदार असे गाव होते. त्या गावाजवळ घनदाट असे जंगल होते. त्या गावामध्ये चिनू नावाचा मुलगा त्याच्या आजीसोबत राहत होता. चिनूच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. आजी अंगणात जाऊन जमेल तशी फळे आणायची आणि आठवडी बाजारामध्ये विकायची. त्यावरच त्यांचे घर चालत असे. शेजारी कधी-कधी मदत ही करत.आजी तशी स्वभावाने मायाळू आणि कर्तव्यदक्ष अशी होती. आपल्या एकुलत्या एक नातवाला मोठ्या कष्टाने शिकवीत होती. तिला वाटायचे की, आपल्या नातवाने म्हणजे चीनूने खूप शिकावे. मोठे व्हावे. त्याचे नाव व्हावे. त्याला लोकांनी ओळखावे. लोकांनी त्याचे कौतुक करावे आणि चिनू पण आपल्या आजीच्या स्वप्नाशी एकनिष्ठ होता. तो अभ्यासात हुशार होताच, पण त्याचबरोबरच तो वेगवेगळी चित्र, कलाकृती, कोरीवकाम, मूर्ती बनवणे यामध्येही निपुण होता, पण घरची परिस्थिती हलाखीची; आजी बिचारी कष्ट करून घर चालवायची. त्यातच चिनूचे शिक्षण ही सुरू. सुट्टीच्या दिवशी वेळ मिळाला तसा चिनू ही आजीला खूप मदत करायचा.एके दिवशी चिनूच्या शाळेमध्ये स्पर्धा होती आणि विषय होता. आवडता छंद या विषयामुळे मूळची अंगी असलेली कला, कौशल्य, ज्ञान याची ओळख होणार होती. चिनूला खूप आनंद झाला. त्याने त्या स्पर्धेत भाग घेतला आणि सुंदर चित्र, वेगवेगळ्या मूर्ती बनवून त्याने स्पर्धेत सहभाग नोंदवला. काही दिवसांनी त्या स्पर्धेचा निकाल आयोजित केला होता आणि सुदैवाने त्यामध्ये चिनूला बक्षीस मिळाले.
त्याने तयार केलेल्या मूर्ती प्रेक्षणीय तर होत्या; त्याबरोबरच रेखाटलेली चित्रही सुंदर होती. त्यादिवशी चिनू भलताच खुश होता, घरी जाऊन आधी आजीला मिठी मारली आणि आजीला बक्षीस दाखवले. आजीला बक्षीस बघून भरून आले. आजीने आपल्या नातवाचे तोंडभरून कौतुक केले. चिनूसाठी खास तिने त्या दिवशी गोडाच जेवण तयार केलं होतं. आजी-नातवाचा आनंद त्यादिवशी गगनात मावेना. चिनूची हुशारी, त्याच्या अंगी असलेले विविध गुण हे त्याच्या वर्गाशिक्षकांच्या तेव्हाच लक्षात आले. त्यांनी चिनूला त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ते चिनूला खूप प्रोत्साहन देत. त्याबरोबरच चिनूला जमेल तशी आर्थिक मदत त्यांनी केली. चिनू त्यांच्या वर्गशिक्षकांचा खूप आवडता हुशार, होतकरू आणि आदर्श असा विद्यार्थी होता.पुढे जाऊन चिनूनेदेखील खूप कष्ट, मेहनत करून आपल्या घरची परिस्थिती सांभाळून, आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता तो गावासमोर एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा आहे. त्याने आपल्या कलेतून उत्तुंग भरारी घेतली आहे आणि एक यशस्वी पुरुष होऊन त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. तो आपल्या या घवघवीत यशामागे, आपल्या प्रेमळ आजी आणि त्यांचे आवडते शिक्षक यांचा खूप मोठा हात आहे, असे मानतो. हलाखीच्या परिस्थितीतून देखील त्याने त्याचे यश संपादन केले. यामधून एवढा बोध आपण नक्कीच घेऊ शकतो की, आयुष्य कितीही खडतर असो, मेहनतीने जिद्दीने आपण यश प्राप्त करू शकतो. आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. ते शक्य करण्याची हिंमत प्रत्येकात असण्याची गरज मात्र नितांत आहे.
- नुतन वाबळे